सारा न्यूज नेटवर्क -
उत्तर सोलापुरात खळबळ: सरपंचासह अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचे आरोप, Special Auditची मागणी
मौजे गावडी दारफळ ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा आरोप, बहुजन हक्क अभियानचे बेमुदत उपोषण
सोलापूर, दि. 6 जुलै 2026: - उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे गावडी दारफळ ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार, माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन व कागदोपत्री घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप बहुजन हक्क अभियान, महाराष्ट्र राज्य या संघटनेने केला आहे. या प्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संघटनेचे उत्तर सोलापूर तालुका सचिव दिलीप काळे यांनी दिला आहे.
नेमके आरोप काय आहेत?
• पारदर्शकतेचा अभाव: e-Gram Swaraj / PFMS या ऑनलाइन पोर्टलवर माहिती अपलोड न करणे, तसेच चुकीची माहिती टाकून दिशाभूल करणे.
• माहिती अधिकाराचे उल्लंघन: RTI अंतर्गत मागितलेली माहिती न देणे, अर्ज मागे घेण्यासाठी अर्जदारास धमकावणे, मारहाण करणे.
• आर्थिक भ्रष्टाचार: संगणक चालकाच्या नावे 2022 पासून लाखो रुपयांची बिले काढणे, विकासकामांच्या नावे सरपंचाच्या नातेवाईकांच्या नावे बिले काढणे.
• धमकी व दबाव: तक्रारदारांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भाषा वापरणे.
संघटनेच्या प्रमुख मागण्या
बहुजन हक्क अभियानाचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने 7 प्रमुख मागण्या केल्या आहेत:
1. विशेष लेखापरीक्षण: सन 2022 पासून ग्रामपंचायतीच्या संपूर्ण आर्थिक व प्रशासकीय कारभाराचे Special Audit करावे.
2. बिलांची पडताळणी: संगणक चालकाच्या नावे काढलेल्या सर्व बिलांची पडताळणी करून फरक आढळल्यास रक्कम वसूल करावी व फौजदारी कारवाई करावी.
3. RTI माहिती द्यावी: माहिती अधिकारात मागितलेली माहिती तात्काळ द्यावी व माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कलम 20 नुसार कारवाई करावी.
4. तक्रारदारांना संरक्षण: धमकावणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून तक्रारदारास पोलीस संरक्षण द्यावे.
5. पोर्टल अपडेट: 2022 पासूनचा सर्व कारभार e-Gram Swaraj/PFMS पोर्टलवर तात्काळ अपडेट करावा.
6. सरपंचावर कारवाई: विद्यमान सरपंच भारत माळी यांनी नातेवाईकांच्या नावे लाखोंची बिले काढल्याने त्यांची चौकशी करून भ्रष्टाचार प्रकरणी अपात्र करावे.
7. निलंबनाची मागणी: चौकशीअंती दोषी आढळणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांना सेवेतून बडतर्फ करावे.
आंदोलनाचा इशारा
संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे यांनी इशारा दिला की, "जोपर्यंत संघटनेच्या मागण्यानुसार शासन-प्रशासन योग्य ती कारवाई करत नाही, तोपर्यंत बेमुदत निषेध धरणे आंदोलन सुरू राहील. गरज पडल्यास समस्त गावकरी, शेतकरी, नागरिकांच्या समवेत तीव्र आंदोलन / उपोषण करण्यात येईल."
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अजय प्रक्षाळे, महिला जिल्हाध्यक्षा लैला अष्टूळ, सोलापूर शहर युवक अध्यक्ष रितेश अष्टूळ यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.




No comments:
Post a Comment