सारा न्यूज नेटवर्क
सोलापूर (प्रतिनिधी) :आज जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन विविध विचारधारेची वृत्तपत्रं जगभर निघत असतात. त्यांची वैचारिक गळचेपी होऊ नये म्हणून हा दिवस 'जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्यदिन' म्हणून पाळला जातो. यामागचा उद्देश जनते मध्ये माध्यमांप्रती जागरुकता निर्माण करणे हा आहे. हा दिवस स्वतंत्र आणि खंबीर पत्रकारांना अविरत पाठींबा दर्शविणारा दिवस आहे.
भारतातील सध्याची परिस्थिती पहिलीत तर लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारिता या व्यवसायाला प्रचंड वाईट दिवस आल्याचे चित्र आहे. मुद्रीत माध्यमे डबघाईला आली आहेत तर दृकश्राव्य (इलेक्ट्रॉनिक मीडिया) माध्यमांना एका ठराविक उद्योगसमूहाला हाताशी धरून सत्ताधारी वर्गाने गिळंकृत केले आहे. रोखठोक भूमिका मांडणाऱ्या आणि सत्य बाजू उघड करणाऱ्या पत्रकारांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. कोणावर खंडणी तर कोणावर दरोड्याचे गुन्हे नोंदवून त्यांना बदनामीच्या चक्रात अडकवण्याचे कटकारस्थान करण्याची पारंपरा सुरू झाली आहे. काहींवर तर थेट हल्ले करून त्यांना जीवे मारण्याचे प्रकार राजरोसपणे सुरू झाले आहेत. अनेक पत्रकारांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत तर अनेकांना पगार मिळेनासा झाला आहे. या सर्वातून कसरत करीत वाट काढणाऱ्या आणि तग धरून उभे राहिलेल्या पत्रकारांना बळ देण्यासाठी संवेदनशील आणि सामाजिक भान असलेल्या लोकांनी पुढे येण्याची गरज आहे. आजच्या दिवसाच्या निमित्ताने नव्या वाटा मोकळ्या होण्याची आणि उज्वल भवितव्याची अपेक्षा व्यक्त करूया.
या दिवसाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा...
💐💐💐💐💐 राम हुंडारे (पत्रकार /संपादक )
सारा न्यूज नेटवर्क
No comments:
Post a Comment