सारा न्यूज नेटवर्क -
रेशीम उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी महारेशीम अभियान - 2025 सुरू..
रेशीम शेतीचा लाभ घ्यावा - जिल्हा रेशीम विकास अधिकारी विनीत पवार..
सोलापूर (प्रतिनिधी) :- दि.17 जिल्ह्यात रेशीम शेती उद्योगासाठी खूप वाव आहे. रेशीम शेतीचे महत्व व त्यातून मिळणाऱ्या शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी याकरीता जिल्ह्यात महारेशीम अभियान-2025 राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात रेशीम उद्योग वाढीसाठी प्रयत्न करावेत. असे प्रतिपादन जिल्हा रेशीम विकास अधिकारी विनीत पवार यांनी केले.
जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये 1हजार 17 शेतकऱ्यांचा 1 हजार 260 एकरावर हा उद्योग चालु असून दि.9 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात रेशीम उत्पादन वाढवण्यासाठी महारेशीम नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली असून जिल्ह्यासाठी नव्याने 500 एकर तुती लागवडीची लक्षांक दिलेला आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग, जिल्हा परिषद व इतर यंत्रणा यांच्या समन्वयाने सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये सुमारे 2 हजार नवीन शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाकडे वळविण्यासंबंधी जनजागृती करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात तुती लागवडीद्वारे रेशीम कोष उत्पादन योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे. यात लाभार्थी निवडताना, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जमाती, दारिद्रय रेषेखालील कुटुंबे, महिला प्रधान कुटुंबे, शारीरिक अपंगत्व प्रधान कुटुंबे, भुसुधार योजनेचे लाभार्थी, कृषी कर्ज माफी योजनेनुसार अल्प भुधारक सिमांत शेतकऱ्यांना निवडण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत रेशीम विकास प्रकल्पासाठी 3 वर्षाच्या कालावधीत अकुशल व कुशल मजुरी देण्यात येते. यात तुती लागवड व जोपासनेसाठी 682 दिवस व कीटक संगोपन गृहासाठी 213 दिवस असे 895 दिवसांची देण्यात येते. स्वत: मजुर म्हणून स्वत:च्या शेतात काम करणे आवश्यक आहे. सध्या प्रती एकर 3 वर्षाकरीता एकूण 4 लाख 18 हजार 815 रुपये इतके अनुदान देण्यात येते. तसेच सिल्क समग्र -2 या योजने अंतर्गत एक एकर नविन तुती लागवडीसाठी सर्वसाधारण गटाकरीता 3 लाख 75 हजार रुपये अनुदान व अनुसूचित जाती/जमाती करीता 4 लाख 50 हजार अनुदान देण्यात येते. लाभार्थी निवडताना इच्छुक लाभार्थ्याकडे मध्यम ते भारी व पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. नवीन तुती लागवड क्षेत्रासाठी सिंचनाची पुरेशी सोय उपलब्ध असणे आवश्यक आहे. एकरी वार्षिक सर्व खर्च वजा जाता किमान 1 लाख 50 हजार रुपये उत्पन्न निश्चीत मिळते.
जिल्ह्यातील सन 2025-26 करीता रेशीम शेतीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी विनीत पवार यांनी यावेळी केले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment