सारा न्यूज नेटवर्क -
मध्य रेल्वे - १७२ वर्षांचा गौरवशाली प्रवास..
भारतीय रेल्वेने १७२ गौरवशाली वर्षे पूर्ण केली आहे.
मुंबई (प्रतिनिधी) :- भारतीय रेल्वेने १७२ गौरवशाली वर्षे पूर्ण केली आहे. दिनांक १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई आणि ठाणे दरम्यान चालणारी आशिया उपखंडातील (आणि भारतात) पहिली ट्रेन बोरीबंदर (सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जिथे आहे) येथून सुरू झाली. जसजशी वर्षे उलटत गेली तसतसे, पहिली ट्रेन चालवणारी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे १९०० मध्ये इंडियन मिडलँड रेल्वे कंपनीमध्ये विलीन झाली आणि उत्तरेला दिल्ली, ईशान्येस कानपूर आणि अलाहाबाद आणि पूर्वेला नागपूरपासून आग्नेयेला रायचूरपर्यंत तिच्या सीमा वाढत गेल्या.
दिनांक ५ नोव्हेंबर १९५१ रोजी, निजाम राज्य, सिंधिया राज्य आणि धौलपुर राज्य रेल्वे एकत्रित करून मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली. सध्या मध्य रेल्वेचे मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे या ५ विभागांसह महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये ४३२२.५५ (रुट) किमी पेक्षा जास्त मार्गांचे नेटवर्क आहे. मध्य रेल्वे ४९२ स्थानकांद्वारे या राज्यांना सेवा देत आहे.
एप्रिल १८५३ मधील पहिल्या ट्रेनपासून ते भारतातील सर्वात आधुनिक ट्रेन, वंदे भारत एक्सप्रेसपर्यंत, रेल्वेने गेल्या १७२ वर्षांत आपले नेटवर्क यशस्वीरित्या वाढवले आहे. सध्या मध्य रेल्वे १० वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालवते, जसे की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मडगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- जालना, नागपूर- बिलासपुर, नागपूर- इंदूर, नागपूर -सिकंदराबाद, कलबुरगि -बेंगळुरू, पुणे- हुब्बल्लि आणि पुणे- कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस.
मध्य रेल्वे अनेक प्रथम कामगिरीसह आघाडीवर आहे. त्यापैकी काही उल्लेखनीय कामगिरी आहेत:
पहिली शताब्दी एक्सप्रेस,
पहिली जन शताब्दी एक्सप्रेस,
पहिली तेजस एक्सप्रेस,
पंजाब मेल सारख्या काही जुन्या गाड्या अजूनही चालू आहेत आणि १०० वर्षांनंतरही प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहेत.
दिनांक ३ फेब्रुवारी १९२५ रोजी बॉम्बे व्हीटी आणि कुर्ला हार्बर दरम्यान भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन सेवा चालवून रेल्वेच्या विद्युतीकरणाचा पाया रचला गेला.
आज मध्य रेल्वेने १००% विद्युतीकरण साध्य केले आहे आणि उपनगरीय नेटवर्कमध्येही सातत्याने वाढ झाली आहे. सध्या मध्य रेल्वेकडे पाच उपनगरीय कॉरिडॉर आहेत. ३ कोचपासून सुरू झालेल्या उपनगरीय सेवा हळूहळू ९ व नंतर १२ कोचपर्यंत वाढल्या असून १५ कोच असलेल्या सेवा देखील चालवल्या जात आहेत. प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी करण्यासाठी वातानुकूलित उपनगरीय सेवा देखील सुरू करण्यात आल्या आहेत. आजपासून मुंबई उपनगरीय भागात वातानुकूलित सेवांची एकूण संख्या ८० झाली आहे.
मध्य रेल्वेच्या स्थापनेच्या वेळी मालवाहतूक १६.५८ दशलक्ष कोटी टन होती, ती आता २०२४-२५ मध्ये ८२.५२ कोटी दशलक्ष टनांपर्यंत वाढली आहे. याशिवाय, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत (एबीएसएस) नवीन रेल्वे मार्गांचे बांधकाम, दुहेरीकरण, पुलांचे बांधकाम आणि ८० स्थानकांचे अपग्रेडेशन यासारखी पायाभूत सुविधांची कामे देखील केली जात आहेत.
नेरळ- माथेरान लाईट रेल्वेनेही आपली गौरवशाली ११८ वर्षे पूर्ण केली आहेत. नेरळ-माथेरान रेल्वेचे बांधकाम १९०४ मध्ये सुरू झाले आणि १९०७ मध्ये दोन फूट गेज असलेला रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून, पावसाळ्यात ही रेल्वे बंद असायची, परंतु अमन लॉज आणि माथेरान दरम्यानची शटल सेवा दिनांक २९.९.२०१२ पासून सुरू करण्यात आली, जी पावसाळ्यातही चालविण्यात येते. नेरळ-माथेरान एनजी मार्गावरील प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास आणि सेवा सुनिश्चित करण्यासाठी मध्य रेल्वेने या विभागात अनेक पायाभूत सुविधांची कामे हाती घेतली आहेत.
१८५३ पासून आतापर्यंत, मध्य रेल्वे नेहमीच सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यात अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपल्या आदरणीय प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि सोयीस्कर प्रवास प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment