सारा न्यूज नेटवर्क -
बालरंगभूमी परिषद, शाखा सोलापूरतर्फे 'इतिहास महाराष्ट्राचा–२०२६' प्राथमिक फेरी उत्साहात संपन्न.
स्नेहल कोळी, स्वामिनी भागानगरे हे राजस्तरावर जिल्हाचे नेतृत्व करणार..
सोलापूर : - बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती मुंबई यांच्या वतीने आणि शाखा सोलापूरच्या आयोजनातून 'इतिहास महाराष्ट्राचा–२०२६' या राज्यस्तरीय महोत्सवांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित एकपात्री, नाट्यछटा, स्वगत, समूह सादरीकरण, नृत्य व संगीत या विविध कलाप्रकारांच्या प्राथमिक फेरीचे आयोजन मा. सीमा यलगुलवार यांच्या अध्यक्षेतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले असून एकल गट क्रमांक एक मध्ये स्नेहल कोळी तर एकल गट क्रमांक दोन मध्ये स्वामिनी भागानगरे हे बाल कलावंत अहिल्यानगर येथे होणाऱ्या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत.अशी माहिती बालरंगभूमी परिषदेच्या प्रमुख कार्यवाह अर्चना अडसूळ यांनी दिली आहे.*
*या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालरंगभूमी परिषद, शाखा सोलापूरच्या अध्यक्षा सौ. सीमाताई यलगुलवार, प्रमुख अतिथी व परीक्षक म्हणून प्रा. अमोल देशमुख (अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील नाट्यतज्ज्ञ) तसेच इतिहास अभ्यासक व सांस्कृतिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व श्री.सुभाष माने, नियामक मंडळाचे सदस्य सुमित फुलमामडी, कार्याध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, प्रमुख कार्यवाह अर्चना अडसूळ, सहकार्यवाह संजय सावंत, मच्छिद्र सपताळे , जेष्ठ संगीत तज्ञ प्रशांत देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.*
बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या अध्यक्षा मा. नीलमताई शिर्के-सामंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या महोत्सवात विद्यार्थ्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचे प्रभावी कलात्मक सादरीकरण केले. महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आणि मूल्यांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले –
एकल गट क्रमांक १ : प्रथम – स्नेहल कोळी
एकल गट क्रमांक २ : प्रथम – स्वामिनी भागानगरे
समूह गट : प्रथम – एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूल.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नटराजाच्या प्रतिमेचे पूजन मान्यवर व बालकलाकारांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात प्रमुख कार्यवाह सौ. अर्चना अडसूळ यांनी बालरंगभूमी परिषदेच्या विविध उपक्रमांची माहिती देत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सभासद नोंदणी करून विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
प्रमुख अतिथी प्रा. अमोल देशमुख यांनी बालकलाकारांना अभिनय, संवादफेक, शब्दोच्चार, आवाजातील चढ-उतार आणि रंगमंचावरील सादरीकरण याबाबत मार्गदर्शन केले. परीक्षक श्री. सुभाष माने यांनीही कलाकारांना नियमावलीचे पालन करत उत्कृष्ट सादरीकरणासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात सौ. सीमाताई यलगुलवार यांनी बालरंगभूमी परिषद हे बालकलावंतांसाठी प्रभावी व्यासपीठ असून आगामी लोककला महोत्सव, दिव्यांग महोत्सव, व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे व विविध कार्यशाळांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय सावंत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बालरंगभूमी परिषदेचा कार्यकारिणी सदस्य सौ. अन्नपूर्णा साखरे, कु. मानसी निलंगेकर तसेच बालरंगभूमी परिषद, शाखा सोलापूरच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
अर्चना अडसूळ
प्रमुख कार्यवाह, बालरंगभूमी परिषद सोलापूर.



No comments:
Post a Comment