सारा न्यूज नेटवर्क -
पत्रकारांच्या हक्कासाठी लढणे ही संघटनांची जबाबदारी कोकण विभागीय पत्रकार अधिवेशन 2025 मध्ये आवाहन...
पनवेल (प्रतिनिधी ) :- राज्यात पत्रकारांवरील हल्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळाले आहे, त्यातच अवैध धंदेवाल्यांनी पोलिसांच्या मदतीने पत्रकारांवर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला असल्यामुळे पत्रकार हे असुरक्षित झाले आहेत. अशा एक ना अनेक घटना, पत्रकारांचे शासन दरबारीं असलेले हक्क यावर मार्ग काढण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती रायगड नवीमुंबईच्या वतीने कोकण विभागीय पत्रकार अधिवेशन 2025 शुक्रवारी पनवेल तालुक्यातील धामणी येथील निसर्गरम्य वातावरणात पार पडले. यावेळी मान्यवरांच्या मार्गदर्शनात पत्रकारांच्या हक्कासाठी संघटनांनी एकत्र आलं पाहिजे आणि लढले पाहिजे ही बाब समोर आली. यावेळी जेष्ठ पत्रकार रमेश औताडे, एआयएमआयएमचे कोकण विभागीय नेते तथा विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र महासचिव हाजी शहानवाज खान, पत्रकार योगेश महाजन, पत्रकार मयूर तांबडे, पत्रकार संतोष जाधव, सुनील वारगडा, दैनिक भास्करचे प्रतिनिधी भूषण साळुंखे, स्नेहकुंज आधारगृहाचे संस्थापक तथा समाजसेवक नितीन जोशी, समाजसेवक रविंद्र पाटील, पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश उपाध्यक्ष किरण बाथम, रायगड नवीमुंबई अध्यक्ष राज भंडारी, सचिव सनिप कलोते आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रमेश औताडे यांनी बोलताना सांगितले की, पत्रकारांच्या हक्कासाठी निवड केलेलं व्यासपीठ हे कौतुकास्पद आहे. आज प्रामाणिक पत्रकारांची परवड होताना पाहायला मिळणे ही बाब मुळात पत्रकारिता क्षेत्रावर एक आघात आहे. जुन्या काळातील पत्रकारिता, त्यावेळचा लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाची ताकद आज काही आमच्याच पत्रकार मित्रांमुळे डागमगली आहे. मात्र केवळ पत्रकारितेवर आपली उपजीविका करणाऱ्या पत्रकारांचे काय ? असा प्रश्न उपस्थित होतो. कोरोना काळात अनेक पत्रकारांना घरी बसविले गेले, त्यांचे रोजगार गेले ? त्यांचे पुढे काय झाले ? त्यांचा परिवार कसा जगत असेल ? याबाबत कोणी विचारत नाही आणि त्याचा कोणाला फारसा फरक देखील पडला नाही, त्याला कारणही आपण पत्रकार आहोत. आज सक्षम झालेल्या पत्रकारांनी त्या पत्रकारांच्या जागी स्वतःला ठेवून विचार करायला पाहिजे, मात्र आजची पत्रकारिता म्हणजे माझी गठडी भरून होऊ दे, नंतर बाकीच्यांचं बघू, यामध्ये एखाद्याच्या जीवावर विसंबून राहिलेले पत्रकार मात्र शिकार होतात. आणि अशाच पत्रकारांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी पत्रकारांचे व्यासपीठ म्हणजे पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेले कोकण विभागीय पत्रकार अधिवेशन 2025 आहे.
यावेळी बोलताना पत्रकार सुरक्षा समितीचे रायगड नवीमुंबई अध्यक्ष राज भंडारी यांनी बोलताना सांगितले की, प्रत्येक क्षेत्रात एकी असते, प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या विरोधात काही आवाज उठवीला तर खात्यातील मंडळी खात्याला सहकार्य करण्यासाठी एकवटतात. मात्र एकमेव पत्रकारिता क्षेत्र फक्त आपलंच बघण्यात जीवन घालवितात. जुन्या काळातील पत्रकारिता आम्ही अनुभवली आहे, 2008 साली मुंबई गोवा महामार्गसाठी कशेडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आवाज रायगड प्रेस क्लबच्या वतीने देण्यात आला असला तरी संपूर्ण कोकणातील पत्रकार हे त्या आंदोलनाला एकवटले होते, आणि त्या आंदोलनात जनतेचे भले होण्यासाठी आमचा सहभाग होता हे आम्ही भाग्य समजतो. मात्र आज पत्रकार स्वतःमध्ये इतके व्यस्त झाले आहेत की, आपल्यानंतर आपल्या मागे आपण सक्षम पर्याय उभा करणे विसरून गेले. प्रामाणिक पत्रकारांच्या वाट्याला अडचणी निर्माण करण्यात देखील काही जणांना फार मोठे पराक्रम वाटू लागले. मात्र ज्या ज्या ठिकाणी पत्रकारावर अन्याय केला जाईल त्या त्या ठिकाणी पत्रकार सुरक्षा समिती लढा देऊन पत्रकारांच्या पाठीशी खंभीरपणे उभी राहील, असेही यावेळी आश्वासित करण्यात आले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment